रात्को म्लादिच : मुस्लिमांना घेरून मारणारा 'बोस्नियाचा कसाई'; नरसंहारानंतर फरार, अखेरीस सापडला कसा?

    • Author, सॅम वुडहाउस
  • Published
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

रात्को म्लादिच यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं. बैलासारखी मजबूत मान असलेल्या रात्को म्लादिच यांना 'बोस्नियाचा कसाई' म्हटलं जात होतं.

1990 च्या दशकात युगोस्लाव्हियाचं विघटन होत असताना त्यांनी बोस्नियन सर्ब सैन्याचा कमांडर म्हणून 'वांशिक शुद्धीकरणा'च्या एका क्रूर मोहिमेचे नेतृत्व केलं. म्लादिच याकडे ग्रेटर सर्बियाचं 'ऐतिहासिक भाग्य' पूर्ण करण्याची संधी म्हणून पाहत होते.

या काळात हजारो पुरुष, महिला आणि मुलांची कत्तल करण्यात आली.

ग्रेटर सर्बिया हे एक ध्येय होतं, जे साध्य करण्यासाठी रात्को म्लादिच यांनी एकनिष्ठ निर्धार आणि सुनियोजित क्रौर्याचा वापर केला.

याच कारणामुळे हिटलरच्या थर्ड राइखनंतर युरोपमध्ये झालेल्या सर्वाधिक रक्तरंजित अत्याचारांपैकी एका अत्याचारासाठी ते जबाबदार ठरले.

मात्र, या कट्टरमुळे ते त्यांच्या लोकांसाठी मात्र नायक बनले. म्लादिच सर्ब (सर्बेरियाचे नागरिक) लोकांना सांगत असत की, त्यांचे मुस्लिम शेजारी 'सर्बांना वधस्तंभावर चढवण्याची, जिवंत जाळण्याची, क्रूसावर चढवण्याची आणि त्यांचे डोळे काढण्याची' योजना आखत आहेत.

त्यांनी सारायेव्होच्या दीर्घ आणि रक्तरंजित वेढ्याचं नेतृत्व केलं. या काळात बॉम्बहल्ले, स्नायपरच्या गोळीबारामुळे आणि इतर हल्ल्यांमुळे दररोज लोक मारले जात होते आणि जखमी होत होते.

त्यांच्या सैन्यानं संयुक्त राष्ट्रांनी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या स्रेब्रेनित्सावर ताबा मिळवल्यानंतर त्यांनी तेथील लोकांच्या सुरक्षेची हमी दिली. मात्र, नंतर 8 हजार पुरुष आणि तरुणांना अज्ञात सामूहिक कबरींमध्ये पुरण्यात आलं.

म्लादिच आणि त्यांचे राजकीय समकक्ष राडोवन कराडझिच यांनी नरसंहार आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांद्वारे बोस्नियाची वाताहत केली.

मात्र, धिप्पाड शरीरयष्टीचा हा युद्धखोर म्लादिच आपल्या कृत्यांबद्दल अजिबात पश्चात्ताप करत नव्हता. हेगमधील खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यांनी पीडितांच्या नातेवाइकांकडे पाहून हसत अंगठा वर केला होता.

त्यांनी कथितपणे म्हटले होते, 'सीमा रक्ताने आखल्या जातात आणि राज्ये कबरींनी चिन्हांकित केली जातात.'

युगोस्लाव्हियात बालपण

रात्को म्लादिच यांचा जन्म 12 मार्च 1942 रोजी सारायेव्होजवळील एका छोट्या डोंगराळ गावात झाला. त्या वेळी हे गाव जर्मनांच्या नियंत्रणाखालील स्वतंत्र क्रोएशिया राज्याचा भाग होते.

मात्र, म्लादिच स्वतःचं वय नेहमीच एक वर्षानं कमी सांगत असत.

त्यांच्या जन्मानंतर दोन वर्षांनी म्लादिच यांचे वडील नाझी समर्थित क्रोएशियन राष्ट्रवाद्यांविरोधात टिटोच्या समर्थकांसाठी लढताना मारले गेले.

दुसऱ्या महायुद्धानंतर नव्याने स्थापन झालेल्या युगोस्लाव्हियात म्लादिच वाढले. काही काळ टिनस्मिथचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लष्करी कारकीर्द निवडली.

1965 मध्ये त्यांनी ऑफिसर स्कूलमधून पदवी घेतली.

महत्त्वाकांक्षी आणि सक्षम सैनिक म्हणून स्वतःला सिद्ध करत ते वेगाने पदोन्नती मिळवत गेले. मॅसेडोनिया आणि कोसोव्होमधील लष्करी तुकड्यांची कमान त्यांनी सांभाळली.

1980 मध्ये टिटो यांचा मृत्यू झाला आणि तो युगोस्लाव्हियाच्या अंताची सुरुवात ठरला. युगोस्लाव्हिया हे आधीपासूनच परस्परविरोधी गट, स्पर्धात्मक राष्ट्रवाद आणि धुमसणाऱ्या द्वेषाने भरलेले अस्थिर संघराज्य होते.

जून 1991 मध्ये क्रोएशियाने स्वातंत्र्य घोषित केले. पुन्हा नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात म्लादिच यांना युगोस्लाव्ह सैन्यासोबत पाठवण्यात आले.

म्लादिच यांनी निर्भीड धाडसासाठी लौकिक मिळवला. ते नेहमी आघाडीच्या खंदकांमध्ये उपस्थित असत आणि भूसुरुंग हटवण्याच्या मोहिमांचे नेतृत्व स्वतः करत असत.

म्लादिच यांच्या सैनिकांना त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. त्यांच्या निष्ठेचे रूपांतर जवळपास धार्मिक भक्तीत झाले होते.

जेव्हा युद्ध बोस्नियापर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांच्या सैन्याने गणवेश बदलला आणि युगोस्लाव्हियापासून फुटून निघालेल्या स्वयंघोषित रिपब्लिका सर्पस्काला पाठिंबा जाहीर केला.

बोस्नियातील मुस्लिम लोकसंख्येकडे त्यांनी परकीय आक्रमक म्हणून पाहिले. हे मुस्लिम ऑटोमन तुर्कांच्या राजवटीचा परिणाम असल्याचे त्यांचे मत होते.

सर्वांत दीर्घ वेढा

म्लादिच यांना हे ऐतिहासिक अन्याय वाटत होतं आणि ते दुरुस्त करणं हा आपला अधिकार आहे, असे त्यांना वाटत होतं. घुसखोरांना बाहेर काढून त्यानंतर आपल्या स्वप्नातील वांशिकदृष्ट्या शुद्ध राष्ट्राची निर्मिती करण्याची त्यांनी शपथ घेतली.

त्यानंतर बोस्नियाची राजधानी सारायेव्होचा वेढा सुरू झाला. शहराचे रक्षण सर्ब, क्रोएट आणि बोस्नियन म्हणजेच बोस्नियन मुस्लिम लोकांच्या एका विस्कळीत बहुजातीय सैन्याकडून केले जात होतं.

म्लादिच यांच्या सैनिकांनी शहराभोवतालच्या टेकड्यांवर मोर्चेबांधणी केली आणि हा वेढा तब्बल 1,425 दिवस चालला.

आधुनिक युद्धांच्या क्रूर इतिहासात हा एखाद्या शहराचा सर्वांत दीर्घ वेढा होता.

22 जुलै 1993 रोजी सुमारे 4,000 तोफगोळे सारायेव्होमधील भयभीत नागरिकांवर डागण्यात आले.

हा क्रूर वेढा संपेपर्यंत शहरातील 13 हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. शहरातील प्रत्येक इमारत एकतर उद्ध्वस्त झाली होती किंवा तिचे मोठे नुकसान झाले होते.

'मुस्लिम भागांना लक्ष्य करा'

सारायेव्होच्या आसपासच्या गावांमध्ये मोठ्या संख्येने पुरुषांना एकतर ठार मारण्यात आले किंवा तुरुंगछावण्यांमध्ये पाठवण्यात आले. हजारो महिलांवर अमानुष बलात्कार करण्यात आला.

जनरल म्लादिच यांच्या मुख्यालयातून जारी करण्यात आलेल्या एका संदेशातून त्यांची भूमिका स्पष्ट होते. त्यात म्हटले होते, 'मी थांबण्याचा आदेश देईपर्यंत संथ गतीने गोळीबार सुरू ठेवा.'

'मुस्लिम भागांना लक्ष्य करा. तिथे फारसे सर्ब राहत नाहीत. ते वेडेपणाच्या टोकावर पोहोचेपर्यंत त्यांच्यावर गोळीबार करत राहा.'

आपल्या शक्तीच्या नशेत त्यांनी रेडिओवरून आदेश दिले. हे संदेश जाणीवपूर्वक एन्क्रिप्ट न करता ठेवले जात, जेणेकरून ते पकडले जावेत आणि नंतर जगभर प्रसारित केले जावेत.

म्लादिच यांचे सैनिक एका इमारतीला वेढा घालत असताना त्यांनी ओरडून सांगितले, 'त्यांची डोकी उडवून द्या.'

आपल्या सैनिकांना ते या आदेशांचे पालन करण्यास अशा प्रकारे सांगत असत, जणू काही ते आदेश स्वतः देवाने दिले आहेत.

मुलीने केली आत्महत्या

म्लादिच यांची दोन मुले आणि पत्नी बेलग्रेडमध्ये सुरक्षित होते. त्यांना भेटण्यासाठी ते आठवड्याच्या शेवटी तिथे जात असत.

ते बोर्ड गेम खेळत आणि संभाषणात जाणीवपूर्वक राजकारणाचा विषय टाळत असत. मात्र, त्यांची 23 वर्षीय मुलगी एना एका तरुण डॉक्टर आणि मानवाधिकार कार्यकर्त्याच्या प्रेमात पडली होती.

त्या डॉक्टरने म्लादिच यांच्या मुलीला अंतिम इशारा दिला, एकतर वडिलांना सोड किंवा पुन्हा माझी भेट घेऊ नकोस.

प्रेमाची स्वप्ने आणि कौटुंबिक नात्यांमध्ये अडकलेल्या एनाने आपल्या वडिलांची आवडती बंदूक तिच्या डिस्प्ले केसमधून बाहेर काढली आणि काही क्षणांतच तिने ट्रिगर दाबला.

मुलीच्या आत्महत्येतून सावरण्यासाठी म्लादिच यांना बराच संघर्ष करावा लागला. या शोकांतिकेसाठी स्वतःला वगळता इतर सर्वांना ते जबाबदार मानत होते.

आणि मग, 1995 मध्ये नाटोचा संयम संपला.

नाटोने सारायेव्होभोवती असलेल्या म्लादिच यांच्या ठिकाणांवर लढाऊ विमाने आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. यातील बहुतांश हल्ल्यांचा विध्वंसक परिणाम झाला.

नाटोच्या कारवाईमुळे सारायेव्होचा वेढा संपुष्टात आला, पण म्लादिच यांची रक्तरंजित वांशिक शुद्धीकरणाची मोहीम अजून संपली नव्हती.

त्या उन्हाळ्यात पूर्व बोस्नियातील स्रेब्रेनित्सा या छोट्या डोंगराळ शहरात हजारो बोस्नियन नागरिक जमले होते. ते संयुक्त राष्ट्रांच्या संरक्षणाखाली होते. संयुक्त राष्ट्रांनी या भागाला 'सुरक्षित क्षेत्र' घोषित केले होते.

बोस्नियन सर्ब सैनिकांनी त्यांच्यावर मोठ्या तोफा आणि रॉकेट्सचा मारा केला. पाच दिवसांनंतर म्लादिच टीव्ही कॅमेऱ्यांच्या पथकाने वेढलेले असताना शहरात दाखल झाले.

शहराच्या मुख्य चौकात म्लादिच यांनी मुलांना मिठाई वाटली, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सर्व काही ठीक होईल, असा विश्वास दिला. मात्र, मुलांची त्यावर फसवणूक झाली नाही.

पुरुषांना गोळ्या घालण्यात आल्या, महिलांवर बलात्कार करण्यात आला आणि या सगळ्या काळात मोजके असलेले डच शांतिसैनिक काहीही करू शकले नाहीत.

यानंतर युरोपच्या भूमीवर दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वांत भयंकर गुन्हा घडला.

म्लादिच यांच्या सैनिकांच्या हाती लागलेल्या प्रत्येक बोस्नियन पुरुषाला पकडण्यात आले, त्यांना दूरवरच्या ठिकाणी नेण्यात आले आणि ठार मारण्यात आले. या हत्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या.

अवघ्या काही दिवसांत 8,000 पुरुष आणि मुलांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यापैकी काहींचे वय अवघे 12 वर्षे होते, तर मारल्या गेलेल्यांपैकी काहींचे वय 70 वर्षांहून अधिक होते. मुले, वृद्ध आणि तरुण अशा कोणालाही सोडण्यात आले नाही.

मारल्या गेलेल्या सर्वांना अमानुषपणे सामूहिक आणि अज्ञात कबरींमध्ये ढकलण्यात आले.

'हा नरसंहार होता'

युरोपीय इतिहासातील हा एक काळा अध्याय आणि संयुक्त राष्ट्रांचा सर्वांत वाईट काळ होता.

हा असा गुन्हा होता, ज्यामागे उच्च पातळीवरचे संघटित नियोजन होते.

लोकांना संयुक्त राष्ट्रांच्या संरक्षणाचे आश्वासन देण्यात आले होते आणि हे सर्व त्यांच्या नाकाखाली घडले.

नंतर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस कोफी अन्नान यांनी लिहिले की, या नरसंहाराची जबाबदारी 'सर्वांत आधी आणि मुख्यतः त्याचे नियोजन व अंमलबजावणी करणाऱ्यांची आहे.'

मात्र, त्यांनी पुढे असेही म्हटले की, आंतरराष्ट्रीय समुदायाने 'निष्पक्षतेच्या तत्त्वावर आधारित निर्णयप्रक्रियेत गंभीर चुका केल्या.'

म्लादिच यांच्यावर युद्धगुन्ह्यांचे आरोप ठेवण्यात आले.

अमेरिकेने त्यांच्या अटकेसाठी उपयुक्त माहिती देणाऱ्याला 50 लाख डॉलरचे बक्षीस देण्याची घोषणा केली.

एका वर्षानंतर बोस्नियाच्या राष्ट्राध्यक्ष बिलजाना प्लासिच यांनी आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत त्यांना पदावरून बडतर्फ केले.

मात्र, हेगमध्ये त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी आणखी 14 वर्षे लागली.

ते बेलग्रेडला परतले आणि त्यांना राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांचा पाठिंबा आणि संरक्षण मिळत राहिले.

म्लादिच खुलेआम जीवन जगत होते. ते मित्रांसोबत हरणांची शिकार करत, आलिशान रेस्टॉरंटमध्ये जेवत आणि अगदी फुटबॉलचे सामने पाहायलाही जात.

आपल्या देशवासीयांच्या मोठ्या वर्गासाठी ते नायकच राहिले. या लोकांना त्यांच्यात सर्बियन युद्धभावना आणि आपल्या राष्ट्राच्या गौरवशाली भूतकाळाची झलक दिसत होती.

त्यांना म्लादिच यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या ताब्यात देण्याची इच्छा नव्हती.

राष्ट्राध्यक्षांनी तर म्लादिच यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी एक लष्करी दलही तयार केले होते.

वयाच्या 69 व्या वर्षी अटक

ऑक्टोबर 2000 मध्ये स्लोबोदान मिलोसेव्हिच यांनाच अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना हेगला पाठवण्यात आले. यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली.

आंतरराष्ट्रीय राजकारणाचा परिणाम दिसू लागला होता आणि फरार आरोपींना संरक्षण दिल्यामुळे सर्बियाला युरोपीय संघात प्रवेश मिळत नव्हता.

स्लोबोदान यांना अटक झाली त्याच रात्री म्लादिच पळून गेले. आपल्या देशात आपल्याला सुरक्षिततेची हमी मिळणार नाही, याची त्यांना जाणीव झाली होती.

म्लादिच यांनी पुढील दशक एका सुरक्षित ठिकाणाहून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी पळण्यात घालवले. सुरुवातीला त्यांच्याकडे निष्ठावान अंगरक्षक होते. नंतर त्यांची संख्या कमी होत गेली आणि अखेरीस त्यांच्या कुटुंबीयांनीच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली.

जुलै 2008 मध्ये त्यांचे माजी राजकीय सहकारी राडोवन कराडझिच यांना बेलग्रेडमध्ये बसमधून अटक करण्यात आली. ते त्यावेळी लांब दाढी वाढवून आध्यात्मिक उपचार करणारे व्यक्ती म्हणून वावरत होते.

खरंतर सर्बियाच्या नव्या सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयाशी औपचारिक सहकार्य सुरू केले होते आणि कराडझिच यांना न्यायालयाच्या ताब्यात देण्यात आले.

यानंतर जनरल म्लादिच यांची पाळी होती. तीन वर्षांनंतर म्लादिच यांनाही शोधून काढण्यात आले.

म्लादिच यांच्या मुलांचा माग काढत पोलीस एका निर्जन, जीर्ण फार्महाऊसपर्यंत पोहोचले. पोलीस कर्मचारी कोणतेही स्पष्ट कारण नसताना अंगणात एकटे उभे होते.

म्लादिच यांच्यात त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य नव्हते. ते खिडकीतून हे सर्व पाहत होते. सुरक्षा दल आत शिरले तेव्हा त्यांना 69 वर्षांचा एक अस्ताव्यस्त अवस्थेतील माणूस आढळला, ज्याला अनेकदा स्ट्रोक आले होते.

खटल्याच्या सुनावणीला तब्बल चार वर्षे लागली. न्यायालयीन प्रक्रिया 500 दिवसांहून अधिक काळ चालली. या काळात सुमारे 600 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आणि जवळपास 10 हजार पुराव्यांची तपासणी करण्यात आली.

योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आले. मात्र, निकाल काय असेल याबद्दल फार कमी लोकांना शंका होती.

स्रेब्रेनित्सा नरसंहाराच्या अगदी आधी म्लादिच आपल्या सैन्याला आदेश देताना कॅमेऱ्यात कैद झाले होते.

नरसंहार, मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि 'युद्धाच्या नियमांचे' उल्लंघन केल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले.

ते हसत आणि कॅमेऱ्यांकडे अंगठा वर करत न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, निकाल ऐकताना ते संतापले.

म्लादिच ओरडले की, हे सर्व खोटे आहे. त्यांना जबरदस्तीने न्यायालयातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या शिक्षेचा अर्थ असा होता की, त्यांचा उर्वरित आयुष्य तुरुंगातच जाणार होता.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अनेक पीडित आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. त्यापैकी एक होते फिकरेट एलिक.

1992 मध्ये बोस्नियन सर्बांच्या छळछावणीत कैद असताना एलिक यांचा एक व्हीडिओ तयार करण्यात आला होता, ज्यात ते अक्षरशः सांगाड्यासारखे दिसत होते. हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहचला होता.

निकालानंतर फिकरेट एलिक म्हणाले, 'न्याय झाला आहे. युद्धगुन्हेगाराला दोषी ठरवण्यात आले आहे.'

तेथे उपस्थित असलेले इतर लोक रडू लागले.

मात्र, या निकालामुळे जगभरात झालेला आनंद सार्वत्रिक नव्हता.

काही बोस्नियन लोक निराश होते, कारण सारायेव्हो आणि स्रेब्रेनित्साच्या बाहेरील गुन्ह्यांसाठी म्लादिच यांना दोषी ठरवण्यात आले नव्हते.

अनेक सर्ब नागरिकांनी या निकालावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

रिपब्लिका सर्पस्कातील एका प्रमुख राजकीय नेत्यानं या खटल्याचा निषेध करत, हा त्यांच्या लोकांना बदनाम करण्याचा कट असल्याचे म्हटले. तसेच इतिहासाच्या शालेय पुस्तकांमधून न्यायालयीन कारवाईचा 'कोणत्याही प्रकारचा उल्लेख पुसून टाकण्याचे' आवाहन केले.

2024 मध्ये म्लादिच यांनी उर्वरित शिक्षा सर्बियात भोगण्याची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा सामना केलेल्या म्लादिच यांनी आपल्या मायदेशात आपल्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेतली जाईल, असा युक्तिवाद केला होता.

आपल्याकडे जगण्यासाठी केवळ काही महिने उरले आहेत, या कारणावरून त्यांच्या वकिलांनी त्यांच्या सुटकेसाठी वारंवार अर्ज केले. मात्र ते सर्व फेटाळण्यात आले.

सर्बिया आणि रशिया या दोन्ही देशांनी त्यांच्या कायदेशीर अपीलांना पाठिंबा दिला.

दुसरीकडे, बोस्नियात जानेवारी 2026 मध्ये एका विरोधी पक्षातील राजकीय नेत्याला कराडझिच आणि म्लादिच यांचे 'गौरवीकरण' केल्याच्या आरोपाखाली तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

अनेक लोकांसाठी 'बोस्नियाचा कसाई' हा केवळ एक साधा सैनिक होता. मात्र, बोस्नियन लोक आणि आंतरराष्ट्रीय समुदायातील बहुसंख्य लोक त्यांना असा खुनी आणि गुंड म्हणून लक्षात ठेवतील, ज्याने युरोपच्या भूमीवर कलंक लावला.

बोस्नियात मुस्लिम आणि सर्ब आजही अस्वस्थ सहजीवनात एकत्र राहतात.

1990 च्या दशकात म्लादिच आणि राडोवन कराडझिच यांनी सुरू केलेले हिंसक राष्ट्रवादी युद्ध संपले असले, तरी तणाव अजूनही कायम आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)